March 2013 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

20 March 2013

सेल्फ अवेअरनेस


सेल्फ अवेअरनेस
मेधा ताडपत्रीकर, महाराष्ट्र टाईम्स  ३० जुलै २०११
मी नेमका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वत:मधील चांगले वाईट गुण समजून घेत, स्वत:मध्ये सुधारणा घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वत:मधील चांगले काय आणि वाईट काय हे डोळसपणे समजून घेत जाणारेच आयुष्यात यशस्वी होतात.
आपल्या बिझी श्येड्युलमध्ये स्वत:बद्दल विचार करायला वेळ मिळत नाही आपण कोण आहोत, आपल्या आवडी-निवडी काय आहेत, आपल्या व्हॅल्यु काय आहेत, आपली जगण्याची परिसीमा काय आहे? आपल्या सवयी आणि स्वयंप्रेरणा काय आहे? याचा विचार करण्यात आपण किती वेळ घालवतो हा संशोधनाचा विषय आहे. आणि स्वत:च्या वागण्याचा विचार करण्यात वेळ घालवणारे खूपच कमी. त्यातूनही स्वत:विषयी मिळणारा फीडबॅक जर आपल्या मनासारखा किंवा चांगला नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करण्याकडेच कल असतो.
मात्र स्वत:चे चांगले आणि वाईट गुण समजून जगाला सामोरे जाणारे आयुष्यात यशस्वी होतातच. प्रत्येकाला कॉन्फिडन्स आणि स्वाभिमान मिळवण्यासाठी स्वत:ला स्वत:ची माहिती असणे महत्त्वाचे असते. 

पण सेल्फ अवेअरनेस म्हणजे नक्की काय? त्याचे आपल्या आयुष्यात महत्त्व का आहे आणि त्यासाठी नेमके काय करायला पाहिजे. सेल्फ अवेअरनेस म्हणजे आपण एक स्वतंत्र आणि एकमात्र व्यक्ती आहोत याची जाणीव असणे. आपले चांगले गुण कोणते याची डोळस माहिती असणे मात्र त्याच वेळेला आपल्याला अजून खूप शिकण्यासारखे आहे याची जाणीव असणे. यात तुम्हाला माहिती नसलेल्या गोष्टींची खुली कबुली देणे आणि आपल्या चुका मनापासून मानणे याचाही समावेश होतो.

सेल्फ अवेअरनेस म्हणजे:
आपल्या आयुष्यात आपल्याला काय करायचे आहे, काय हवे आहे हे माहिती असणे. स्वत:चे चांगले गुण आणि आपल्यातली कमकुवत बाजू तुम्हाला स्वयंप्रेरणा कशामुळे मिळते आणि कशामुळे तुम्ही सुखी होता स्वत:बद्दल किंवा स्वत:च्या आयुष्यात काय बदल हवे ह्याची जाणीव असणे. आतापर्यंतच्या आयुष्यात मिळवलेले यश तुमचे इतरांबरोबरचे वर्तन कसे आहे आयुष्य संपन्न होण्यासाठी करावी लागणारी प्रगती तुमची ठाम मते आणि ध्येय. तुम्ही स्वत:कडे कुठल्या नजरेने बघता/ स्वत:विषयीचे मत, यात अजूनही गोष्टींचा समावेश होऊ शकतो.

सेल्फ अवेअरनेसचे महत्त्व:
तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतेही बदल घडवायचे असतील तर त्यासाठी कोणतीही कृती करण्याआधी स्वत:ला समजून घेणे महत्त्वाचे असते. योग्य दिशेने जाण्यासाठी काय केले पाहिजे ह्याची जाणीव जर आपण स्वत:ला ओळखत असू तरच होते. आपला मार्ग बरोबर की चूक हे अपणच ठरवू शकतो. वय वाढले तरी आयुष्यात काय मिळवायचे आहे ते माहिती नसलेले अनेकजण आपल्याला आजूबाजूला दिसत असतात. त्यांच्या  आयुष्यात ध्येय नसते वा दिशा नसते. येईल तो दिवस जगायचा इतकेच ही मंडळी करताना दिसतात. अशा प्रकारच्या जगण्यामुळे फ्रस्ट्रेशन वा डिप्रेशन येण्याची शक्यता असते. मात्र सेल्फ अवेअरनेसमुळे आपल्या आवडीचे, योग्यतेचे  करिअर करणे शक्य होते.
स्वत:ला समजावून घेणे म्हणजे आत्मकेंद्री होणे नाही तर यातून स्वत:ला ओळखून, स्वत:च्या मतांशी प्रामाणिक राहून इतरां बरोबरची नाती संपन्न करणे हे होय. ह्याचा उपयोग कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी होतो. तुम्हाला लोकांशी बोलायला, त्यांच्यात मिसळायला आवडत नसेल तर लोकाभिमुख व्यवसाय निवडणे आपल्या प्रवृत्तीच्या विरूद्ध जाते आणि त्यातून आनंद, सुख मिळत नाही. आपण हिमनगासारखे असतो. बऱ्याचशा भागाशी आपली ओळखही नसते. त्यामुळे आपल्या वागण्याने कधीकधी आपणच चकित होतो. 

प्रसिद्ध लेखक ऑस्कर वाईल्ड म्हणतो,  स्वत:ला समजून घेण्याची पहिली पायरी म्हणजे स्वत:चा स्विकार करणे. प्रत्येकाला आपण दुसऱ्यासारखे नाही याचे वाईट वाटते. मात्र आपल्या सारखे दुसरे कोणीही नाही हे मात्र विसरले जाते. स्वत:बरोबर वेळ घालवायला, मनाशी संवाद साधायला आपल्याकडे वेळ नसतो किंबहुना आपल्याला स्वत:ला वेळ द्यायचा म्हणजे गिल्टी वाटत किंवा वेड्या कल्पना वाटतात. दहा मिनिटे शांत बसलो तर फोन करायचा आठवतो, गाणे ऐकावेसे वाटते. काहीवेळा आपण जर स्वत:चा विचार केला तर स्वत:ला आवडणार नाही अशी सुप्त भितीही मनात असू शकते. यामुळे आपण स्वत:च्या कंपनीऐवजी इतरांची कंपनी शोधतो. स्वत:विषयी सांगा असे म्हटले की लोक आपले नाव, काय करतो, कोठे राहतो, कुटुंबात कोण हे सांगतात. पण आपण म्हणजे आपल्या नावापेक्षाही अधिक, कामापेक्षा, व्यवसायापेक्षा अजून काही  आहोत . आपल्या मित्र मैत्रिणींपेक्षा वेगळे राहतो त्या ठिकाणापेक्षा अधिक जगात वस्तूंपेक्षाही आपण अधिक असतो पण ते काय याचा प्रत्येकाने शोध घेतला पाहिजे. आपण जेव्हा कामात खूप बिझी असतो किंवा खूप एकाग्र होतो तेव्हा मेंदूचा भाग जो सेल्फ अवेअरनेसचे कार्य करतो तो टर्न ऑफ करतो. आपण एखादे काम झोकून देऊन एकाग्रतेने करतो तेव्हा स्वत:ला काय वाटते हे मनातही येत नाही. त्यासाठी स्वत:ला वेळ देऊन, स्वत:ला केंदस्थानी ठेवून डोळसपणे समजावून घेणे हे सतत आणि आयुष्यभर होत राहणे गरजेचे आहे.

सेल्फ अवेअरनेससाठी काय केले पाहिजे?
  • स्वत:शी प्रामाणिक राहून आपल्या वागणूकीचा जमाखर्च पाहणे
  • आपल्या जवळच्यांना तुमच्या बद्दल योग्य फिडबॅक द्यायला सांगा आणि त्यावर न चिडता विचार करा.
  • समोरच्याचे न आवडणारे गुण आपल्याला आवडत नाहीत याचे कारण म्हणजे ते गुण आपल्यातही असतात. तेव्हा लोकांशी वागताना आपल्याला काय आवडत नाही हे पाहताना स्वत:लाही तपासा.
  • आपल्याला ज्याचा आदर्श वाटतो त्यांच्या जीवनाकडे पहा. त्यातले काय भावते आणि ते वेगळे काय करतात ते पहा.
  • ज्यांच्या बद्दल आदर आहे अशांना तुमच्यात काय बदल अपेक्षित आहेत हे न संकोचता विचारा. या विषयावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत ती वाचण्याची सवय ठेवा.
  • इंटरनेटवर अनेक प्रकारचे क्विझ  टेस्ट उपलब्ध आहेत,  त्यांचा स्वत:ला समजून घेण्यासाठी उपयोग करा.
  • आणि सगळ्यात जरूरीचे म्हणजे स्वत:साठी वेळ देऊन मनाशी संवाद साधायला शिका. ह्यामुळे आपली स्वत:शी नव्याने ओळख होऊन मैत्री होऊ शकते, जी आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उपयोगी ठरते. कारण आपण स्वत:कडे कसे बघतो हे इतर आपल्याकडे कसे बघतात यापेक्षा जास्त महत्त्वाचे असते. 


12 March 2013

जागवा आपल्यातील नेतृत्व

जागवा आपल्यातील नेतृत्व
सी. ई. पोतनीस, सकाळ, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२
मानवानं अनेक शोध लावले. होय, शोधच म्हणता येईल; नवशोध म्हणता येणार नाही. कारण निसर्ग म्हणजेच विपुलता व उपलब्धता. निसर्गात सर्वच आहे. मानवानं केवळ आहे त्या वस्तूंची जोडणी करून, मांडणी बदलून नवीन वस्तू शोधून काढल्या. हेच नेमकं आपल्याबाबतही लागू आहे. आपणही गुण-कौशल्यांची खाण आहोत. आपल्यातही विपुलता व उपलब्धता आहे. आपल्यात असलेले गुण आपल्याला शोधून काढायचे आहेत. त्या गुणांची जोडणी, मांडणी करून नवीन कसब, कौशल्य निर्माण करायचं आहे.

नेतृत्व ही नैसर्गिक देणगी आहे, की आत्मसात करता येणारं कौशल्य, याविषयी बहुतेकांचं दुमत आहे. तरीही साधारणपणे नेतृत्व ही नैसर्गिक देणगी आहे, असेच अनेकांचं मत असतं. खरं तर नेतृत्व आणि व्यवस्थापन हे गुण प्रत्येक व्यक्तीत उपजतच असतात. नेतृत्व व व्यवस्थापन हे गुण म्हणण्यापेक्षा नैसर्गिक गरज म्हणणंच रास्त ठरेल. या भौतिक जगात जगण्याकरता व पुढं जाण्याकरता काही मूलभूत साधनांची, गुणांची, कौशल्यांची गरज असते. ही सर्व साधनं परमेश्‍वरानं आपल्याला उपलब्ध करून दिलेली असतात. नेतृत्व व व्यवस्थापन हेही असंच मूलभूत साधन आपणा सर्वांकडं असतंच. आपल्यात नेतृत्वाचे व व्यवस्थापनाचे गुण आहेत, ही जाणीव अन्‌ विश्‍वास आपल्याला नसतो. त्यामुळंच नेतृत्व हे काही मोजक्‍या जणांसाठीच आहे, ही सर्वसाधारण धारणा असते; तसेच नेतृत्व अन्‌ व्यवस्थापन ही केवळ व्यवसाय/ सामाजिक क्षेत्रात अधिकारपदावर असलेल्या लोकांचीच गरज आहे, असाही समज आहे. या धारणेमुळं आपल्यातल्या नेतृत्वाविषयीच्या अन्‌ व्यवस्थापनाविषयीच्या गुणांकडं लक्षही दिलं जात नाही.

मानवानं अनेक शोध लावले. शोधच (Discovery) म्हणता येईल; नवशोध (Invention) म्हणता येणार नाही. कारण निसर्ग म्हणजेच विपुलता व उपलब्धता. निसर्गात सर्वच आहे. मानवानं केवळ आहे त्या वस्तूंची जोडणी करून, मांडणी बदलून नवीन वस्तू शोधून काढल्या. हेच नेमकं आपल्याबाबतही लागू आहे. आपणही गुण-कौशल्यांची खाण आहोत. आपल्यातही विपुलता व उपलब्धता आहे. आपल्यात असलेले गुण आपल्याला शोधून काढायचे आहेत. त्या गुणांची जोडणी, मांडणी करून नवीन कसब, कौशल्य निर्माण करायचं आहे. नेतृत्व, व्यवस्थापनाचं कसब हे अशातलंच एक आहे. आपण प्रत्येक जण ते वापरतही असतो. हे अर्थात नकळत, अजाणतेपणानं, क्वचित व अपघातानं वापरलं जातं. तसंच ते बहुधा सुप्तावस्थेत असतं.

व्यवसाय, नोकरी, सामाजिक क्षेत्रांत जेव्हा कामाचा व्याप मोठा व हाताखाली काम करणारे सहकारी असतात, फक्त तेव्हाच नेतृत्व आणि व्यवस्थापन आवश्‍यक असतं, अशीच बहुतेकांची समजूत असते. अशा वेळी नेतृत्वाची खरी कसोटी लागते, याबाबत शंकाच नाही; परंतु हे सर्व काही नसतानाही नेतृत्व आणि व्यवस्थापनाची गरज असतेच, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण स्वतःपुरतंच मर्यादित काम करत असतो, तेव्हाही या गुणांचा वापर होत असतो वा होणं अपेक्षित आहे. नेतृत्व काही केवळ हाताखाली किंवा समवेत सहकारी असतानाच होतं, असं नाही. स्वतःचं स्वतःकरता नेतृत्व आणि व्यवस्थापन अत्यंत गरजेचं आहे. याची खरी सुरवात तर वैयक्तिक पातळीवरच होत असते; तसेच स्वतःकरताचं व्यवस्थापनही गरजेचं आहे. प्रथम नेतृत्व अन्‌ व्यवस्थापनातला फरक समजून घेऊ या. नेतृत्व म्हणजे ध्येय ठरवणं, दूरदृष्टी असणं, दिशा देणं, प्रोत्साहित करणं, विश्‍वास संपादन करणं व उंचावणं, इत्यादी. व्यवस्थापन म्हणजे ठरवलेल्या ध्येयाकडं आखलेल्या दिशेनं कूच करणं. यात योजना, वेळेचं नियोजन, कामाची आखणी, असलेल्या साधनांचा परिणामकारक वापर करणं इत्यादी गोष्टी येतात. विचार केल्यास लक्षात येईल, की हे सर्व स्वतःलाही लागू आहे. चांगल्या नेतृत्वाशिवाय आणि व्यवस्थापनाशिवाय चांगलं आयुष्य जगणं अशक्‍यच आहे. त्यामुळंच विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, व्यावसायिक अशा सर्वांनाच आपल्यातलं नेतृत्व शोधणं आवश्‍यक आहे. आपल्या आयुष्याला ध्येय हवं, दिशा हवी, स्वतःला प्रोत्साहित ठेवता येणं गरजेचं आहे. त्याशिवाय योजना व वेळेचं नियोजन, इत्यादीही साधता आलं पाहिजे, हेच तर स्वतःचं नेतृत्व व व्यवस्थापन.

आपण प्रत्येकजण हे गुण वापरत असतोच. त्यांचा आवाका कमी-जास्त असतो. त्यात सातत्य नसतं. बर्‍याचदा त्यांचा वापर नकळतच होतो. संकटात, अतिमहत्त्वाच्या प्रसंगी, अचानक जबाबदारी पडल्यावर हे सुप्त गुण जागृत झाल्याचं आढळतं, अशी अनेक यशस्वी उदाहरणं आपल्या पाहण्यात असतील. असंच एक उदाहरण म्हणजे मदर तेरेसा यांचं. कॅथॉलिक शाळेत शिकवणारी ही संन्यासिनी. मुख्याध्यापिका होऊन शाळेचं नेतृत्व आपल्याला करता येईल, याचा विश्‍वासही नसलेली ही संन्यासिनी; परंतु गरिबातल्या गरिबांच्या दारिद्य्रानं आणि दुःखानं ती हेलावली. त्यातूनच नेतृत्व जागृत झालं. प्रेमाच्या झर्‍यानं आणि नेतृत्वाच्या आधारानं तिनं उभारलेली संस्था जगभरात सर्वत्र सेवा पोचवत आहे.

आपण प्रत्येक जण काही ना काही तरी निर्णय घेत असतो, निवड करत असतो, एक दिशा ठरवत असतो, त्या मार्गानं चालत असतो. समस्या एवढीच आहे, की हे सगळं आपण अजाणतेपणाच्या अवस्थेतून करत असतो. नेतृत्वासारख्या अन्‌ व्यवस्थापनासारख्या गुणांना आपण आकार दिलेला नसतो. जाणीवपूर्वक त्या गुणांना जोपासलेलं नसतं. त्यामुळं अपघातानंच व क्वचित या गुणांची चुणूकही आपल्याला जाणवते. सराव नसलेला खेळ खेळताना अचानक आपल्याकडून एखादी सुंदर खेळी होते! ती चुकून, म्हणजेच अपघातानं, घडलेली असते. आपल्यातली ही खेळी वारंवार व आपल्याला हवी तेव्हा होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. या जाणीवपूर्वक व सततच्या प्रयत्नांतूनच हे कौशल्य, कसब निर्माण होतं व कायमस्वरूपी साथ देतं. त्यानंतर अपघातानंच नव्हे, तर ठरवून हवा तो परिणाम घडवून आणता येतो; तसंच नेतृत्व अन्‌ व्यवस्थापन हे जाणिवेच्या पातळीवरच घडवणं आवश्‍यक असतं.

व्यावसायिक, सामाजिक आदी क्षेत्रांतल्या नेतृत्वाची व्याप्ती जास्त असते. त्यात इतरांना दिशा देणं, प्रोत्साहित ठेवणं आदींची जबाबदारीही आपल्यावर असते. या क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी तशी आवड तर हवीच; पण त्यासाठी मोठी तयारीही हवी. वैयक्तिक नेतृत्व व व्यवस्थापनावर पकड असल्याशिवाय इतरांचं नेतृत्व करणं व इतरांचं व्यवस्थापन सांभाळणं अशक्‍यच. दुर्दैवानं अनेक जण अशा नेतृत्वात तयारीविना पडलेले असतात. नोकरीमधल्या काही वर्षांचा अनुभव काहींना ओघानं त्यात नेतो. मागच्या काही वर्षांतलं यश हे नेतृत्वातही यश देईल, हा अत्यंत चुकीचा समज. यात यश मिळवण्यासाठी बरीच तयारी लागते. खरं तर आपल्यातलं नेतृत्व आधी विकसित होऊन नंतरच तसं पद मिळावं. लोक पदाच्या मागं असतात; पण नेतृत्व व व्यवस्थापन विकसित करण्यावर त्यांचं लक्ष नसतं. त्यामुळंच या पदांवर अनेकांची केविलवाणी अवस्था होते. हाताखाली सहकारी असतात; परंतु नेतृत्वाचा अभाव असतो. असं नेतृत्व संस्थेचं; तसंच सहकार्‍यांचंही नुकसान करतं.

व्यावसायिक, सामाजिक इत्यादी क्षेत्रांत नेतृत्व करायचं की नाही, हा प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा प्रश्‍न. प्रत्येकानं या दिशेला वळलं पाहिजे असंही नाही; परंतु अशा नेतृत्वाची जर महत्त्वाकांक्षा असेल, तर सर्वप्रथम स्वतःसंदर्भात काम करणं गरजेचं आहे. वैयक्तिक पातळीवर नेतृत्वावर आणि व्यवस्थापनावर पकड असलीच पाहिजे. स्वतःला दिशा नसेल तर दुसर्‍यांना काय दिशा देणार? स्वतःला ध्येय नसेल तर इतरांच्या ध्येयपूर्तीला काय मदत करणार? स्वतःचं नियोजन करता येत नसेल, तर इतरांना व्यवस्थापन काय शिकवणार? स्वतःला प्रोत्साहित ठेवता येत नसेल तर इतरांना काय प्रोत्साहन देणार? अशा नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा नसली तरी केवळ आपल्यासाठीही हे गुण विकसित करणं गरजेचं आहे. स्वतःचं स्वतःवरचं नेतृत्व व व्यवस्थापन आपल्या जीवनाला हेतू देतं. सर्वांगीण विकास घडवतं. यातूनच आपलं जीवन खुलतं-फुलतं.

नेतृत्व विकसित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. निर्णय घेण्यानंच निर्णयशक्ती वाढते. प्रत्येक निर्णयाच्या परिणामातून जाणीवपूर्वक शिकता येतं. त्यातूनच योग्य निर्णय घेण्याची तयारी होते. ध्येयनिश्‍चिती, स्वतःवरचा विश्‍वास, वेळेचं नियोजन यावर काम करावं. प्राधान्य कशाला द्यावं हे जाणीवपूर्वक ठरवणं गरजेचं आहे. सातत्यानं या गोष्टींचा जाणीवपूर्वक सराव केल्यास नेतृत्व व व्यवस्थापन विकसित झाल्याखेरीज राहणार नाही. इतरांबरोबरच्या नेतृत्वामध्ये प्रामाणिकपणा व विश्‍वासार्हता याला सर्वांत अधिक महत्त्व आहे, हे जाणावं. स्वतःपेक्षा दुसर्‍यांचं हित महत्त्वाचं, हा नेतृत्वातला महत्त्वाचा गुण. याच्याशिवाय आपण खरं नेतृत्व देऊ शकणार नाही, हे ध्यानी ठेवावं. जबाबदारी घेणं हादेखील नेतृत्वातील एक महत्त्वाचा गुण. आपल्या आयुष्याची जबाबदारी ही केवळ आपलीच. आपल्यातलं नेतृत्व जागवा, जीवनाला दिशा द्या. जीवन घडवा.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites